जिल्हा टँकरमुक्त
या महिन्यात पडलेल्या चांगल्या पावसाने जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जून महिन्यातच जिल्हा टँकरमुक्त होण्याची गेल्या दशकभरातील ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.
गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्हा टॅंकर वाडा बनला होता. गेल्यावर्षी तर रेकॉर्ड ब्रेक टँकर जिल्ह्यात सुरू होते. विशेषतः वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड या तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. गेल्या वर्षी मात्र काही प्रमाणात टॅंकरला ब्रेक लागले. ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने सिंचन प्रकल्पात पाणी आले तर काही प्रमाणात जमिनीतील पाणी पातळी वाढली होती. त्यामुळे यावर्षी टॅंकरची संख्या खूपच मर्यादित राहिली. तरीही औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक शंभरावर टॅंकर सुरू होते. त्या खालोखाल गंगापूर वैजापूर या तालुक्यात टँकर सुरू झाले.
मान्सून पूर्व पावसाने दिलासा
दरम्यान, यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. एक जून पासून सुरू झालेला पाऊस सलग दहा दिवस कोसळत होता. गेल्या कित्येक वर्षाची सरासरी या पावसाने मोडीत काढली. औरंगाबाद तालुक्यात तर सर्वाधिक २२८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात औरंगाबाद तालुक्यातील टॅंकर निम्म्याने कमी झाले. त्यानंतर जिल्हाभर पडलेल्या चांगल्या पावसाने इतर तालुकेही टँकर मुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
मराठवाड्यात १४२ टँकर सुरू !
जिल्हा टँकरमुक्त झाला असला तरी मराठवाड्यात मात्र अजूनही १४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्या खालोखाल नांदेड १७, उस्मानाबाद १५, जालना १० तर लातूर जिल्ह्यात ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मराठवाड्यातील ९८ गावांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.